– डॉ. उषा गडकरी
युवराज सिद्धार्थाच्या समोर सर्व सुखे हात जोडून उभी होती. त्याच्या जीवनाला दु:खाचा थोडा सुद्धा स्पर्श झालेला नव्हता. एकदा मात्र रथातून रोजच्या सारखा फेरफटका मारत असतांना त्याला अतिशय गलितगात्र झालेल्या वृद्धाचे दर्शन झाले. वृद्धाला डोळ्यांनी दिसत नव्हते. कानांनी ऐकू येत नव्हते. केस पिकले होते, गात्रे शिथिल झाली होती. हातापायातली शक्ती नष्ट झाली होती. हातातील काठी टेकत टेकत थरथरणाऱ्या पावलांनी तो कसेबसे एकेक पाऊल पुढे टाकत होता. युवराज ऐन तारुण्यात होता. कालांतराने प्रत्येक तरुण व्यक्तीची अशीच स्थिती होते या कल्पनेने तो कमालीचा अस्वस्थ झाला.
दुसरे दिवशी ज्याच्या हातापायाची बोटे झडली आहेत, ठिकठिकाणी जखमा झालेल्या आहेत, त्यातून रक्त वहाते अशा अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या रोगी व्यक्तीचे दर्शन त्याला झाले. त्याची स्थिती पाहून तो मूळातून हादरून गेला.
तिसरे दिवशी चार व्यक्ती एका प्रेताला खांद्यावरून वाहून आणीत होते. प्रत्येक जिवंत व्यक्तीची परिणती अखेर मृत्यूत होते. त्याचे निष्प्राण कलेवरात रूपांतर होते. मृत्यू म्हणजे सर्व संपणे या कल्पनेचा प्रचंड धक्का त्याला बसला. रोग, जरा, मरण हे सिद्धार्थाने पूर्वी पाहिले नव्हते असे नाही. परंतु त्या क्षणी संपूर्णार्थाने त्या अवस्थांमध्ये निहीत असलेल्या दु:खाचे जे साक्षात् दर्शन सिद्धार्थाला झाले त्यातूनच संपूर्ण जीवनाची निरर्थकता त्याला जाणवू लागली. या दु:खाचा संपूर्ण छडा लावण्याचा ध्यासच त्याने घेतला. कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा गयेला बोधिवृक्षाखाली त्याला ज्ञान प्राप्त झाले तेव्हा दु:ख, दु:खकारण, दु:खनिरोधाचा मार्ग या चार सत्यांचा त्याला साक्षात्कार झाला. त्यालाच बुद्धाची चार आर्यसत्ये म्हणतात.
बुद्धाचा दृष्टिकोण अतिशय व्यावहारिक होता. त्याला तात्त्विक चर्चांचे वावडे होते. एखाद्याला बाण लागून जर जखम झाली, आणि त्याची वेदना तो साक्षात अनुभवत असताना प्रथम त्या दु:खाचा परिहार कसा होईल याचा विचार करणे आवश्यक आहे. पण एखादी व्यक्ती जर बाण कोणी मारला? बाणाची लांबी किती होती? तो कोणत्या धातूचा होता? तो किती अणकुचीदार होता? त्याची जाडी किती होती? जखम वरवरची आहे की खोलवरची आहे याचाच विचार करीत बसला तर त्या व्यक्तीचे क्लेश अधिकच तीव्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच प्रथम दु:ख आहे आणि त्या दु:खाचा निरास करण्याचा मार्ग कोणता आहे हा विचार जास्त महत्त्वाचा आहे.
सिद्धार्थाला बुद्धत्त्व प्राप्त झाल्यानंतर त्याचा शिष्य संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढला. लोक आपल्या कथा/व्यथा घेऊन गौतम बुद्धाकडे येऊ लागले. आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ लागले. प्रश्न विचारणा-यांमध्ये अनेक लोक तात्त्विक प्रश्न विचारीत असत. उदाहरणार्थ १) हे जग शाश्वत आहे का? २) हे जग अशाश्वत आहे का? ३) या विश्वाला सुरुवात आहे का? ४) या विश्वाला अंत आहे का? ५) जीव व शरीर एकच आहेत का? ६) जीव व शरीर भिन्न आहेत का? ७) तथागत मृत्यूनंतर असतो का? ८) तथागत मृत्यूनंतर नसतो का? ९) तथागत मृत्यूनंतर असतोही नसतोही. १०) तथागत मृत्यूनंतर असतो असेही नाही व नसतो असेही नाही.
– एप्रिल २०१८
