पूर्वीचे लोक टीव्ही ला इडियट बॉक्स म्हणायचे. पण आता टीव्ही सुद्धा इडियट बॉक्स न राहता स्मार्ट टीव्ही झालेला आहे. आणि आताच्या दिवसात सर्वसामान्य नोकरदारांच्या घरी सुद्धा फ्लॅट स्क्रीन असलेले एल सी डी/ एल इ डी टीव्ही बघायला मिळतात. त्यामुळे टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा सामान्य माणसाला परवडतील अशा किमतीचे टीव्ही सेट्स बनवण्याची चढाओढ लागलेली असते. त्यात आता सामान्य माणसाचे राहणीमानही सुधारू लागले आहे. साधारण एक ३२ ते ४० इंचाचा टीव्ही घ्यायचा ठरवला तर कोणालाही आपले खिसे चाचपावे लागत नाहीत. आणि आजकाल सर्वच एका स्मार्ट टीव्हीवर उपलबध आहे इंटरनेट, ओटीटी प्लॅटफॉर्म वगैरे… आणि या ओटीटी ची सर्वात जास्त मजा कुठे अनुभवायला मिळत असेल तर ती मोठ्या स्क्रीनच्या टीव्ही वरच.

आणि म्हणूनच की काय मोठ्या एलइडी/एलसीडी टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांचा शेअर गेल्या ५ वर्षात तिपटीने म्हणजेच ४०% पर्यंत वाढला आहे. टीव्हीच्या कमी झालेल्या किंमती आणि श्रोत्यांच्या टीव्ही बघण्याच्या बदललेल्या सवयी यांचा परिणाम म्हणून मार्केट मधील टीव्ही कंपन्यांचा शेअर वाढत आहे. CRISIL ने दिलेल्या एका अहवालानुसार मोठ्या टीव्हीच्या किंमतीत ५ वर्षांत झालेली घट फार महत्वाची आहे. टीव्ही सेट्स च्या किंमती ३५% ते ४०% नी कमी झाल्या आहेत. २०१७ साली ५५ इंच स्क्रीनच्या टीव्हीची किंमत १ लाख होती. तीच आता ५५ हजार ते ६५ हजार पर्यंत असते. ही अचानक घट कशी झाली?
तस पाहायला गेलं तर जुन्या टीव्ही विक्री करणाऱ्या कंपन्यांसोबत आता झिओमी, वियु टेक्नॉलॉजीज आणि वन प्लस या कंपन्या सुद्धा टीव्ही निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यामुळे साहजिकच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात स्पर्धा सुरु झाली आहे. क्रिसिलचे असोसिएट डायरेक्टर श्री एलिझाबेथ मास्टर यांच्या मते २०२७ पर्यंत मोठ्या टीव्हीची बाजारातील मागणी ५० % पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कारण ओ टी टी चा वाढता वापर, महामारीच्या काळात ग्राहकांच्या टीव्ही बघण्याच्या बदलेल्या सवयी, आणि फायबर तो होम मुळे ब्रॉड बँड सेवांची वाढलेली गुणवत्ता या सगळ्या कारणांमुळे साहजिकच ग्राहकांचा मोठा टीव्ही घेण्याकडे कल अधिक आहे.
आजकाल ओटीटी वर वेब सिरीज बघण्यासाठी सुद्धा लोक मोठ्या स्क्रीनचे टीव्ही घेतात. खरतर भारतामध्ये गेल्या काही वर्षांत इंटरनेटचा वापर वाढला आहे. २०१५ मध्ये एकूण लोकसंख्येच्या २०% लोक इंटरनेट वापरायचे. २०२२ मध्ये हेच प्रमाण ६२ % वर गेले आहे. श्री पुशन शर्मा यांच्या मते बाजारात आजघडीला टीव्ही चे ७० हुन जास्त ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत. स्मार्ट टीव्ही मध्ये फीचर्स सुद्धा जास्त असतात. पाश्चात्य देशातील लोक २०१८ पासूनच स्मार्ट टीव्ही वापरतात.
चांगली बॅण्डविड्थ आणि इंटरनेटची सुधारलेली गुणवत्ता यामुळे ओटीटी वर कार्यक्रम बघणाऱ्यांची संख्या २०२१ च्या तुलनेत १/४ ने वाढली आहे. हे बघून इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्याही ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी आपले दर कमी केले आहेत. २०१८ मध्ये एका इंटरनेट प्लॅनची किंमत १००० रुपये होती. तोच प्लॅन आता ४०० ते ५०० रुपयात मिळतो. आणि स्पीड ही चांगला असतो. इंटरनेटच्या सुधारलेल्या सेवेमुळेच महामारीच्या काळात ओटीटी जास्त पाहिला गेला. आणि लोकांचा ताळेबंदीचा काळ त्यातल्यात्यात सुखावह गेला.

ताळेबंदीच्या काळात जेव्हा चित्रपट गृह ५० % क्षमतेने सुरु होती. तेव्हा बऱ्याचशा चित्रपट निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित केले. ते बघण्यासाठी लोकांनी मोठे टीव्ही खरेदी केले. तसेच त्या काळात मुलांचे शिक्षणही ऑनलाईन सुरु होते. त्यामुळे घराच्या बाहेर न पडताही करमणूकही होत होती आणि मुलांचे शिक्षणही सुरु होते. म्हणजेच एका दगडात दोन पक्षी.
लोकांचे दरडोई वाढते उत्पन्न हा मुद्दा सुद्धा इथे लक्षात घ्यायला हवा. २०१८ -१९ या आर्थिक वर्षांत लोकांचे दरडोई उत्पन्न अनुक्रमे १०.९% आणि ९.३% ने वाढले. आणि त्याच वेळेस मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीच्या बाजारातील किंमती कमी झाल्या. बाजारातील हा बदल बराच काळ टिकून राहील असे दिसते.
