– गीताजंली ताम्हाणे
भारतात शतकानुशतकांच्या परंपरेने विकसित करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधने ही साऱ्या जगातल्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी कायमच कुतुहलाचा विषय झालेली आहेत. कारण या सौंदर्य प्रसाधनांना पैसा फार लागत नाही. ती घरीच तयार केली जातात आणि त्यातल्या एखाद्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर चुकला तरीही त्याची कसलीही रिऍक्शन येत नाही. ीभारतीय सौंदर्य प्रसाधनासाठी लागणारी सामुग्री आपल्या दारात असते, आजीबाईच्या बटव्यात असते नाहीतर आपल्या स्वयंपाकघरातल्या तिखटामिठाच्या डब्यात तरी असते. यातली कोणतीही वस्तू आपल्या शरीराशी विसंगत नाही. एवढी सोपी ही सौंदर्य प्रसाधने केवळ सौंदर्यच वाढवतात असे नाही तर ती आपल्या आरोग्यालाही हितकारक असतात. औषधी म्हणनही उपयुक्त असतात. खरे तर भारतीय आयुर्वेदाने औषधी गुणधर्म आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म यांना वेगळे केलेले नाही. कारण आरोग्य चांगले असेल तरच सौंदर्यही खुलत असते. सौंदर्य आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे आयुर्वेदाने मानले आहे. पोट साफ असेल, छान झोप झाली असेल, मनाची चिडचिड होत नसेल आणि अल्प पण पोषण द्रव्य युक्त आहार घेतला असेल तर सौंदर्य प्रसाधनांचा फारसा वापर करावा लागत नाही.
भारतीयांच्या या वैशिष्ट्यामुळे आज पाश्चात्य देशातले सौंदर्य प्रसाधनांचे निर्माते भारतातल्या सौंदर्य प्रसाधनांप्रमाणेच ही निसर्गाने दिलेले पदार्थ वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना रसायनांच्या ऐवजी ही नैसर्गिक साधने वापरण्याचे महत्त्व पटायला लागले आहे. भारतीयांच्या सौंदर्य प्रसाधनांत कडुलिंब, तुळस, हळद, चंदन, मध, शिकेकाई, आवळा, मुलतानी माती, दही, दाळीचे पीठ, केसर यांचा वापर केला जात असतो. या वस्तूंच्या वापराने महिलांचे सौंदर्य तर खुलतेच पण प्रकृतीवर त्यांचा चांगला परिणाम होत असतो. यातला कडुलिंब तर आपल्याला पदोपदी आढळतो पण त्याचे उपयोग आपल्याला माहीत नाहीत. त्यावर अमेरिकेत मात्र हजारो संशोधने झाली आहेत. कडुलिंबाचे बी, साल, पाला, अर्क असा प्रत्येक अवयव उपयुक्त ठरत असतो. कडुलिंबाच्या बियाचा अर्क हा त्वचेच्या विकारांवर गुणकारी समजला जातो.
आपल्या प्रत्येकाच्या अंगणात तुळशीचे रोप असतेच. तुळशीच्या पानाचा अर्क आणि दूध यांचे मिश्रण करून ते त्वचेवर लावल्यास डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतात आणि वाढत्या वयातल्या मुलामुलींना होणारा तारुण्य पीटिकांचा त्रास कमी होतो. हळद हे तर घराघरात वापरले जाणारे सौंदर्य प्रसाधन आहे. हळदीशिवाय आपला कोणताच धार्मिक कार्यक्रम होत नाही. लग्नात तर नवरा-नवरीला हळद लावण्याचा खास कार्यक्रम असतो. हळद लावल्यास त्वचेला तुकतुकी येते आणि तिची चमक वाढते. शिवाय हळद ही जंतुनाशकही असते. ‘पी हळद हो गोरी’ अशी म्हण मराठीत आहे. अर्थात हळद पिल्याने लगेच कोणी गोरे होत नाही असा या म्हणीचा अर्थ असला तरीही लगेच नाही पण सावकाशीने का होईना पण हळदीने गोरेपणा येतो हे नक्की. चंदन हे महाग आहे पण ते वापरल्याने त्वचा मऊ होते. शिवाय चंदनाची उटी लावल्याने रक्त प्रवाहही सुधारतो. त्वचेचे विकार हे प्रामुख्याने रक्तप्रवाह सुरळीत नसल्याने होत असतात. ते चंदनाने कमी होतात. काही ऍलर्जीही चंदनाने बऱ्या होतात.
सर्वात महागडे सौंदर्य प्रसाधन म्हणजे केशर. त्याने चंदनाचे सारे फायदे होतात. मध हा किती तरी प्रकारांनी उपयुक्त असतो. मध आपल्या चेहऱ्याला लावला तर तो त्वचेचा कोरडेपणा कमी करतो. मध, दूध आणि केसर यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा फारच तेजस्वी दिसतो. शिकेकाई ही तर एक वनस्पती आहे पण आज बाजारात उपलब्ध असलेला कोणताही शांपू शिकेकाईची बरोबरी करू शकणार नाही. आवळा हा तर केसांना आणि डोक्याच्या त्वचेला ‘क’ जीवनसत्त्व पुरवीत असतो आणि केसांची वाढ चांगली करीत असतो. मुलतानी माती, दही आणि डाळीचे पीठ यांचे तर सौंदर्य प्रसाधन म्हणून फारच उपयोग आहेत.
